जागे असा अथवा निद्रित
ह्रदयाची स्पंदने सदैव निनादत असतात
मनातील विचारांची पाखरे फडफडत असतात
आणि मेंदूतील संवेदना विचारांचा पाठलाग करतात
ह्र्दय, मेंदू, मन यांचा एकत्रित संगम जेव्हा घडतो
तेव्हा उमटतात त्या उस्फुर्त प्रतिक्रिया
खुले व्यासपीठ : औंध ... एक विचार !

औंध : एक स्वप्न : - अप्पासाहेब पंतप्रतिनिधी

१५ ऑगस्ट १९४७. भारत स्वतंत्र झाला ! स्वराज्यप्राप्तीचा आनंद मनाला सुखवीत होता पण औंध हे औंध म्हणून नाहीसे होणार याची जाणीव मनाला खंत देत होती. गेल्या काही वर्षात औंध संस्थान एक मोठे कुटुंबच झाले होते. एक परंपरा -जिच्या रूपाने परिवर्तन करून मुळे शाबूत ठेवावयाची आम्ही खटपट करीत होतो ती - अस्तंगत होती. हे सर्व व्हावयास पाहिजे असे वाटणाऱ्या माझ्या एका मनाला परंपरेचा पोलादी दोरखंड काचण्या लावीत होता. जीवनाची पाळेमुळे कोठे कोठे खोल रुजलेली असतात !
फेडरेशनची कल्पना स्वप्नवत होती - इतिहासाच्या जोराने वाहणाऱ्या प्रवाहात आयत्या वेळी वाळूचा बांध घालावयाचा तो प्रयत्न होता असे मला आता इतक्या वर्षानंतर कळते. तेव्हा मन बाबांच्याभोवती घुटमळत होते. औंधचा स्वराज्यदान प्रयोग अवतीभोवती पसरावा व त्यांना मोठेपणाचा मान मिळावा हीच दुर्दम्य इच्छा होती.
आता त्या घटनांकडे बघताना आणखी एक वाटते. माझे प्रयत्न मला तेव्हा वाटत होते तसे 'निष्काम' नव्हते. म्हणूनच कदाचित मी लोकांच्या मनात संशय निर्माण करीत असेन, स्वत:ला अडथळे निर्माण करीत असेन. भगवान बुध्द म्हणतात त्याप्रमाणे 'सम्यक् कर्म' करावयाची जर माझी पात्रता असती तर ? पण सर्वच दक्षिण संस्थानिक व हा सर्व प्रयोग हा सबंध भारताच्या इतिहासाच्या भव्य पटलावर एक भातुकलीचा खेळ होता.परिवर्तनाच्या प्रचंड जलौषात तो कुणीकडच्या कुणीकडे वाहून गेला.
बदल झाले. संस्थाने विलीन झाली. मला वाटे, बाबांनी खऱ्या अर्थाने केलेली देशसेवा कोठेतरी रुजू होईल. खरे म्हटले तर, ब्रिटीश सरकारला औंध म्हणजे एक डोकेदुखीच होती. परंतु राज्यसत्तात्याग करण्यापूर्वी त्यांनीही बाबांना किताब दिला.
पंडितजी १९४१ मध्ये औंधला येऊन राहून गेले होते व औंध-प्रयोगाबद्दल त्यांनी आमचे अभिनंदन केले होते. मला वाटले होते, ते तरी बाबांना बोलवतील, गौरव करतील, धन्यवाद देतील. त्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगाचे व परिस्थितीने घडलेल्या नव्हे, तर जाणूनबुजून केलेल्या त्यागाचे - स्वतंत्र मिळण्यापूर्वी ब्रिटिशांना तोंड देऊन दहा वर्षे आधी केलेल्या त्यागाचे चीज होईल, त्यांच्या उतारवयात त्यांना त्याचा आनंद होईल, त्यांचे आयुष्य वाढेल.
प्रत्यक्षात हे काहीच झाले नाही. सातारहून कोणीतरी तिसऱ्या दर्जाचा अधिकारी आला आणि कशातरी घाईघाईने छापलेल्या कागदावर - विलीनीकरणाच्या दस्तऐवाजावर - बाबांची सही त्याने मागितली. एक ऐतिहासिक घटना घडत आहे, त्या प्रसंगाची काही बूज, काही शान राखली जावी याची दाखलही त्या बिचाऱ्याला नव्हती.
माझे पुतणे युवराज बापूसाहेब यांना अवघडून आले. बाबांपेक्षा ते जास्त दु:खी झाले. औंध स्वराज्यदान प्रयोग चालू असताना बापूसाहेब इंग्लंडमध्ये होते. १९४३ साली परत आल्यावर चाललेल्या प्रयोगात भाग घेण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. जनशक्ती ओळखून तिला आपलीशी केली पाहिजे हे त्यांनाही पटले होते. होते तसेच चालू राहिले असते, तर युवराज हे मानाचे स्थान त्यांचे कायम राहिले असते. त्यांच्या शब्दाला औंध संस्थानात किंमत राहिली असती. विलिनीकरण झाल्यावर तेसुद्धा राहणार नव्हते. विलीनीकरणाच्या कागदावर सही होण्याच्या वेळीच जिन्यावरून धावत वर येत ते मला म्हणाले, "काका, हे थांबवता येणार नाही का ? तुम्ही पुन्हा जाऊन महात्माजींना भेटा ना. औन्ध्ची सत्ता जनतेच्या हाती आहे. औंध स्वतंत्र का राहू नये ? " मी त्यांना ही गोष्ट आता, या घटकेला अशक्यप्राय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा प्रवाह धो-धो पुढे जात होता. त्यात उलट दिशेने कोण पोहणार ?
बाबांनी कऱ्हाडदेवीसमोर विलीनीकरणावर सही केली. तीनदा मोठ्याने ते ' जय जगदंबे ' म्हणाले व गप्प झाले - अगदी गप्प. तीनशे वर्षांनी औंध संपले होते !
बाबा गेले, बापूसाहेबही गेले. आता राजा हे पदही गेले आणि औंध ? औंधही वाऱ्यावर विरले काय ?

- अप्पासाहेब पंतप्रतिनिधी

स्त्रोत : अप्पा पंत एक प्रवास एक शोध | खुले व्यासपीठ.....
अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
अप्पासाहेब पंतप्रतिनिधी
गुगल जाहिरात

पिंपळपान - राम नाईक

एखद्या कसलेल्या धावपटूला शोभेल अशा वेगात भल्या पहाटे औंधच्या डोंगरावरील श्री यमाई देवीच्या दर्शनासाठी धावत निघालेले औंधचे महाराज बघण्यासाठी मी बालपणी उत्सुक असे. धावणाऱ्या महाराजांचे दर्शन हा माझ्या हा माझ्या बालवयातला एक अनोखा आनंद असे. १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धातील माझ्या जन्मानंतरची पहिली ६-७ वर्षे मी औंधमध्ये होतो. त्या काळातील हि सर्वात लोभस आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. आजच्या तरुणाईच्या भाषेत कै. बाळासाहेब पंतप्रतिनिधी माझेच नव्हे तर तमाम औंधातल्या मुलांचे जणू आयडॉलच होते!
औंधच्या महाराजांच्या शाळेत माझे वडील कै. दामोदर विठ्ठल नाईक म्हणजेच नाईक मास्तर मुख्याध्यापक होते. पुढे वडिलांची बदली होऊन आम्ही औंध संस्थानातीलच आटपडिला रहायला गेलो, तरी औंधशी जुळलेलं नातं कायम राहिलं वारंवारच्या भेटीमुळे ते जोपासलं गेलं. आज मागे वळून पाहताना वाटत कि माझ्या जडणघडणित औंधचेहि एक खास स्थान आहे. इथे थोरामोठ्यांच्या अस्तित्वाचे कळत - नकळत जे संस्कार झाले ती शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडली.
आमचं घर होत प्रसिद्ध उद्योजक कै. शं. वा. किर्लोस्कर यांचे बंधू कै. रा. वा. किर्लोस्कर यांच्या शेजारी. स्वाध्याय आश्रमांचे वेदशास्त्र संपन्न पंडित सातवळेकर (सुप्रसिद्ध चित्रकार माधव सातवळेकर यांचे वडील) यांच्या स्वाध्यायमाला पुस्तकांच्या ज्ञानगंगेचे काही कणही औंधमध्येच वाट्याला आलेले. माझ्याही लहानपणीपासून औंधातले पंतप्रतीनिधींचे वस्तुसंग्रहालय म्हणजे तर बाहेरच्या जगाचा आरसाच. मोठेपणी 'हेन्री मूर' किती मोठा शिल्पकार आहे हे जाणवलं. पुढे देशाचा पेट्रोलियम मंत्री या नात्याने इंग्लंडलाही जायचा योग आला. तिथे तर तो अनेकांचे दैवत. त्याच हेन्री मूरचे मूळ 'मदर अण्ड चाईल्ड' शिल्प आपल्या औंधात बालवयात पहिले आहे हे इंग्लंड मध्ये सांगताना कोण अभिमान वाटला होता.
औंधचे महाराज सूर्यनमस्कारांचे भोक्ते. शाळेतही विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार घालून घ्यावेत असा त्यांनी नियम केला होता. कडक शिस्तीच्या माझ्या वडिलांनी त्यांच्या या नियमांचे शाळेत काटेकोर पालन केले. सतत अकरा वर्षे दररोज घातलेल्या त्या २५ सूर्यनमस्कारांनी जो कटकपणा - कणखरपणा आला त्यांच्या बळावरच आज वयाच्या पंच्याह्त्तरीतही दिवसाचे बारा - चौदा तास मी उत्साहाने समाजकारण करू शकतो. औंधकरांचे हे देणे फेडता न येण्यासारखेच.
औंधकरांच्या शाळेत गरिबालाही शिक्षण घेण्याची सोय होती. माझ्या लहानपणी मुलीना व शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण होते. तर इतर विद्यार्थ्यांसाठी अवघी दोन आणे फी होती. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान खालसा झाली. पण अशा प्रागतिक निर्णयांमुळे औंधसारखी संस्थान लोकांच्या मनावर नंतरही राज्य करीत राहिली. माझ्या वडिलांनीही शिक्षणाची अतिशय तळमळ होती. तिचे चीज औंधकरांनी केले. त्यांना विद्यार्थ्यांचे भरपूर प्रेम मिळाले. अनेकांनी त्यांचे सदैव स्मरण ठेवले. महाराष्ट्राचे वाल्मिकी कै. ग. दि. माडगुलकर, मराठवाडा (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर) विद्यापीठाचे कुलगुरू कै. शंकरराव खरात, व्यंकटेश माडगुलकर यासारखे महाराष्ट्रभूषण माझ्या वडिलांचे औंधकर विद्यार्थी. या सर्वांचा स्नेहही आयुष्यात श्रीमंत करणारा ठरला. त्यामुळे मला औंधच्या आठवणी या सदैव पुस्तकात जपलेल्या पिंपळपानासारख्या वाटतात.

- राम नाईक

स्त्रोत : शिलंगण आणि छायाचित्र - कर्मयोद्धा - राम नाईक (मुखपृष्ठ) | खुले व्यासपीठ.....
राम नाईक
गुगल जाहिरात

रंग तळ्याचे - आप्पा पुराणिक

मनाला अत्यंत आनंदित करणारा शब्द म्हणजे 'रंग'
मनात आनंदाच्या लहरी निर्माण करण्याची केवढी ताकद रंग या शब्दात आहे.
औंधच्या तळ्याचे रंग असेच मजेशीर आहेत.
फार पूर्वी गावात अकरा तळी होती असे सांगितले जाते. काही गाळाने भरून आली. काहींची पडझड झाली. काहींवर दगडमाती टाकून लोकांनी घरं बांधली, तर काहींच्या विहरी झाल्या. आज तीन तळी सुस्थितीत असून दोन पाण्याने तुडुंब भरलेली आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्वांत मोठी तळी बहुतेक औंधची असावीत. दोन्ही प्रचंड तळी; पण पलीकडील मोठे व अलिकडील लहान, या तळ्याला पाच घाट असून वेगवेगळी नांवे आहेत. चारी कोपऱ्यांवर हेमाडपंथी छोटी महादेव मंदिरे आहेत. यमाईचे भक्त मोकळाईच्या घाटात हातपाय धुतात व देवीचे दर्शन घेऊन समईतील तेल लावतात. खरुज, नायटे, त्वचारोग बरे होतात हि श्रद्धा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत लोकांची पोहण्यासाठी कोण गर्दी ! या गावात निष्णात पोहणारे असंख्य होते. डबे, दोर, मोदळ, टायरट्यूब, इत्यादी साधने होतीच. ओंडक्याप्रमाणे पाण्यावर निश्चल तरंगणारी मानसही कमी नव्हती. रामभाऊ चितारी, दादुमिया माहूत, बाबुराव मोदी, बापूबुवा हरदास, वरुडकर - इनामदार बंधू इत्यादी काही ठळक व्यक्ती.
या तळ्यात पोहणारा माणूस समुद्रही पार करेल इतका आत्मविश्वास येथे मिळेल. पुरोगामी विचारांची किर्लोस्कर - ओगले मंडळी तर या त्या काळात स्विमिंग कॉस्च्युम घालून पोहत असत अ हा गावात कुतूहलाचा व चर्चेचा विषय होत असे.
पैलवान घाट खास पुरुषांसाठी. वाकलेल्या गुलमोहराच्या झाडावरून ताठपणे वर चढत जाऊन पाण्यात मुटकळा टाकून उंच पाणी उडवणे ही स्पर्धाच जणू पाहायला मिळायची. त्या उंच तुषारातून साकारलेला इंद्रधनुष्याचे मनोवेधक रंग मनातील आनंदाचे कारंजे जणू निर्माण करी. वासू खटावकर, इनामदार, यादव, माने, रणदिवे, पोळ यांचा सहभाग असायचा.
खांबाला कवटाळणे, खांब पुढेमागे हलवणे, वर चढून सूर मारणे यामध्ये वेगळीच काही मजा वाटे. अश्यातच मुलं ओरडायला लागत, " आलं, आलं, विमान आलं !" बाप्पा किर्लोसाकारांच्या विमानानं मूळपीठला फेऱ्या मारून अगदी खालून तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून केव्हा उंच उड्डाण केले हे काळायचंही नाही.
हायस्कूल मुलामुलींची 'वॉटर बॉल' चे सामने पाहण्यासाठी खुद्द राजेसाहेबांची स्वारी खुर्चीवर विराजमान होत व प्रोत्साहन देत.
शाहीर नानिवडेकर हे पोहण्यासाठी औंधकरांना अगदी परिचित. तर ते उत्तम क्रीडापटू व जलतरणपटू होते हे कित्येकांना माहित नाही. मोकळाई घटनजिक उंच शिड्या बांधून त्यावरून समर सॉल्ट, उलटी उडी इत्यादी थक्क करणारी ऑलम्पिक दर्जाची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली. राजेसाहेबांनी तोंडभरून वाहवा केली. त्यांची पाठीवर थाप ही लाखमोलापेक्षाही अधिक वाटायची.
आमची प्राथमिक शाळा तळ्यानजिक हिरापुरीबुवांच्या मठात असे. खोल्या लांबट, बसण्यास गोणपाटाची बस्करे, विस्तारलेल्या उंच वडाच्या, झाडाच्या, झाडावरील मोर केकारव करीत. समोरच्या काळापलिकडील शेतात नाचणारे असंख्य मोर पाहून बालमन अगदी हुरळून जायचं. विविध आकारांची पिसे गोळा करून गुच्छ केल्याचा आनंदही त्याकाळी भरून वाहायचा.
तळ्याच्या काठावर बसून पाण्यातील रंगतरंग पाहण्याची वेगळी गंमत वाटायची. दगड टाकून लांब पसरत जाणाऱ्या लाटा, लाह्या,चिरमुरे पाण्यात फेकून त्याभोवती खाण्यासाठी सळसळत येणारे मासे, हे पाहण्यात किती वेळ गेला हे त्यावेळच्या धुंद मनाला समजायचे नाही. मुलाचा शोध घेणाऱ्या आईचा जोराच धपाटा बसल्यावर मन शुद्धीवर यायचं. मार खात, फरफटत घरी जावे लागे.
राजवाड्यातील प्रत्येक सन उत्सव जणू गावाचाच. अशा कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असे. गणेशोत्सव, शिवजयंती, रामनवमी इत्यादी लक्षात राहणारे उत्सव !
त्याकाळी घरातील बायकांना डोंगराएवढी कामे. त्यातून कडक सासुरवास. सून म्हणजे बंधनात जखडलेली, मन मेलेली पारतंत्र्यातील बाई ! औंधातील सुनांना विसाव्याचे ठिकाण म्हणजे तळं. कपड्यांचा ढिगारा घेऊन तळ्याच्या घाटावर कपडे धुणं म्हणजे महिलेला जाचातून काही वेळ मुक्तता.
या निमित्ताने मोकळेपणा मिळायचा. सासूबद्दल चेष्टामस्करी, टवाळकी, चहाड्या तक्रारी, विनोद गोष्टी केल्यामुळे मनं हलकी व्हायची आणि कपड्यांचा ढिगारा धुऊन हातावेगळा केव्हा झाला हे कळायच देखील नाही. घरी येताच खूप वेळ झाला म्हणून पुन्हा सासूची बोलणी खावी लागत.
गावातील चंद्रा नायकीण म्हणजे एक बडं प्रस्थ ! सुस्वरूप, गोरा रंग, सुडौल बांधा आणि देवानं दिलेली आवाजाची देणगी. लावणी ऐकण्यासाठी लांबलांबचे रसिक येत. कुणीतरी शक्कल काढली. " आपण महाराजांना भेटू व चंद्राचं नाचगाणं तळ्यात करू. महाराज खूष व गावही खूष होईल."
ठरलं. राजेसाहेबांचा होकार मिळाला. पुढील कामे वेगाने होऊ लागली. पण तरंगता रंगमंच ? कुणीतरी बोललं, "मी करतो मंच. " उसाच्या रसाळी मोठी काहील आणली गेली. त्यावर फळ्या टाकल्या. डांब उभारले. कागदाची तोरणं बांधली. रंगीत कापड गुंडाळले. उसाचे सोट, केळीचे खुंट बांधले. गॅसबत्या अडकवल्या.
चैत्री पौर्णिमेची रात्र. सुशोभित रंगमंचाचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब. काठावर मध्यभागी राजेसाहेब. भोवताली रसिकजणांची प्रचंड गर्दी ! ढोलकीवर थाप पडली. वाद्य सुरात लागली आणि कलाकारांनी लवून मुजरा केला. सुरात स्वर मिसळले. एक लांब लकेर मारून चंद्रा चार पावलं पुढं आली. टाळ्यांचा कटकडाट. नाचगानं रंगात आलं. दोन अडीच तास केव्हा सरले ते कळलं नाही. धुंद मैफिल, धुंद रसिक, धुंद वातावरण.
पण एकदम अघटीत घडलं. काहिलीत पाणी शिरलं. काहील जड झाली आणि चक्क डोळ्यासमोर पाहता पाहता बुडाली ! सर्वत्र हलकल्लोळ, हाहा:कार, राजेसाहेबांनी उभे राहून लोकांना सोन्याचं कडं दाखवून कलाकारांना वाचवण्याचे आवाहन केले.
पटाईत पोहणारे धडाधड पाण्यांत घुसले. बुड्या मारल्या. पण व्यर्थ ! वाचले ते फक्त केळाचे खुंट व उसाचे मोट.
पाण्याच्या पृष्ठभागावर लाटांचा तालावर एका कोपऱ्यात ढोलकी हुंदके देत होती. सर्वत्र निराशा, दु:ख आणि शोक !
पण हे असं कसं घडलं ? काहिलीच्या बुडास एक अगदी छोटसे छिद्र होते. कुणी शहाण्यांन त्या भोकाला कणिक तिंबून लावली. पाण्यातील माशांनी ती खाल्यावर पाणी हळूहळू काहिलीत शिरले आणि रंगाचा बेरंग झाला.

- आप्पा पुराणिक

स्त्रोत : शिलंगण | खुले व्यासपीठ.....
आप्पा पुराणिक
रंग औंधच्या तळ्याचे
रंग औंधच्या तळ्याचे
रंग औंधच्या तळ्याचे
रंग औंधच्या तळ्याचे

पंतांचा ऐरावत - औंधकरांची गजलक्ष्मी - श्री. उदय वसंत चितारी, सौ. सुनीति उदय चितारी

 

 

आटपाट नगर होतं. त्याचं नाव होतं औंध. ह्या औंध नगरीतील 'रामप्रसाद' हत्तीची ही कहाणी.
तो दुर्दैवी दिवस मला आजही आठवतो. सकाळीच सातारा जिल्ह्यातून लग्नाच्या वरातीची ऑर्डर आल्याने पागेतून याह्या माहुताने हत्तीला बाहेर काढले. अंघोळ घालून रंगवले, सजवले. झूल घालून रामप्रसादची स्वारी तयार झाली. माहुताने चालण्याची आज्ञा दिली. पण आज काहीतरी बिनसले होते. रामप्रसादची मर्जी नव्हती. खालच्या देवीच्या देवळात येऊन सोंड उंचावून देवीला त्याने त्रिवार नमस्कार केला. पण पुढे पाऊल पडेना. पुनः पुन्हा होणाऱ्या अंकुशाच्या माराने तो बेचैन झाला. पुढे श्रीनिवासराव महाराजांच्या समाधिला नमस्कार झाला. वरच्या देवीच्या टेकडीशी येऊन मूळपीठाकडे तोंड करून जोरदार सलामी दिली. याह्या माहूत पुनः पुन्हा त्याला गावाबाहेर जाण्यासाठी टोचू लागला आणि तितक्याच वेळा तो आपली नाराजी दाखवत राहिला. शेवटी मोठ्या कष्टाने रामप्रसादने गावची वेस ओलांडली. दहापंधरा पावले जेमतेम टाकली तोच त्याचा पाय घसरला व रस्त्याच्या उजवीकडे एका छोट्याशा खड्यात कलंडला. पण पडतानाही त्याने माहुताला विरुद्ध बाजूला अलगद उतरून दिले व धरणीवर देह झोकून दिला. सगळा मिनिट भराचा मामला आणि आमच्या गजराजाने रामप्रसादने प्राण सोडला. सगळा परिसर नि:स्तब्ध झाला. गावात बातमी आली आणि शोकसागर उसळला. घराघरातून माणसे वेशीवर धावत आली. आबालवृध्द शोकाकुल झाले. आम्ही लहान मुले तर रडूच लागलो. गाड्यावरून हत्तीला पागेत आणले गेले. सर्व औंधकरांनी साश्रूपूर्ण नयनांनी त्याला निरोप दिला. कसा विसरू मी तो दिवस ?
औंधच्या महाराजांच्या रामराज्यात भाग घेण्यासाठी जणू देवीनेच 'रामप्रसाद' पाठवला होता. त्याचा दिवस सुरु होई भूपाळ्या ऐकत. नंतर तळ्याकाठी आंघोळ करून तो डोंगरावर चरण्यासाठी जाई. संध्याकाळी रमत - गमत गावातून चक्कर टाकत असे. तो इतका शांत व समंजस होता, कि वाटेत रांगते मूलही आले तरी तो स्तब्ध उभा राहत असे. त्याने कधीही कोणालाही जाणूनबुजून इजा केली नाही. कोणी व्यापारी त्याला नारळ देई तर कोणी त्याला केळी देई. पण त्याचे आवडते खाद्य म्हणजे ऊस. ऊस त्याला फार आवडे. संध्याकाळच्या देवीच्या आरतीने त्याचा दिवस मावळे. तो दिसायला सुंदर व भारदस्त होता. पण खरा दिमाख दिसे तो नवरात्र उत्सवात. नवरात्रोत्सवात त्याचे स्थान मानाचे होते. माहूत त्याला रंगावी, भरजरी झूल घाली. गळ्यात सोनेरी घंटा अडकवी. पायात चांदीचे जाड वाळे घालून रामप्रसाद चालू लागल्यावर वाटे कि, जणू साजशृंगार करून लग्नासाठी नवरदेवच चालला आहे. दसऱ्याला सोन्याच्या अंबारीत राजेसाहेब बसले म्हणजे त्याच्या चालण्यात एक धीरगंभीर भाव जानवे. पौषातील जत्रेमध्ये चाबिन्यापुढे व रथापुढे चालताना एका वेगळ्याच ऐटीत पावले पडत असत. रथासामोरची त्याची उपस्थिती हे एक आकर्षण होते. त्यावेळी आमच्या गावात बैलगाड्यांच्या शर्यती होत. त्यांना चिअर-अप करण्यासाठी 'रामप्रसाद' डुलूडुलू धावत असे. त्यावेळी फार गंमत येई. आमच्या चितारी घराण्याचे पंत घराण्याशी फार घरोब्याचे संबंध होते. माझ्या आई - दादांच्या लग्नाची वरात याच हत्तीवरून निघाली होती. किती आठवणी सांगू ?
'वनकेसरी' सिनेमाच्या शूटींगच्यावेळी घडलेला एक रोमहर्षक प्रसंग मला आठवतोय. बऱ्याच फिल्मच्या शूटींगसाठी आमचा हत्ती जात असे. यावेळी औंधच्या मैदानात शूटिंग चालू होते. मोठ्या अणकुचीदार खिळ्यांच्या दरवाजाला धडक देऊन हत्ती आत शिरतो. त्या दृष्ट माणसाला सोंडेत पकडून गरागरा फिरवून फेकून देतो. धावत जाऊन त्याच्या छातीवर पाय देतो व त्याला ठार मारतो. या शॉटला काही केल्या स्टंटमन तयार होईना. तो खूप घाबरला होता. माहुताने चार-पाच वेळा स्वतः त्याला शॉट करून दाखवला. तेव्हा कुठे महत् प्रयासाने स्टंटमन तयार झाला. माहुताने हत्तीला तयार केले. दरवाजा पडला. हत्तीने आत येऊन त्या माणसाला उचलले व उंच फिरवून अलगद गवतावर फेकले. नंतर धावत येऊन हळूच अचूक त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि शॉट ओके झाला. अत्यंत समंजसपणे आमच्या या अभिनेत्याने हा शॉट दिला व सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 'गजगौरी' हा सिनेमा म्हणजे त्याच्या अभिनयाचा कळसच होता. अगदी 'फिल्मफेअर' अॅवॉर्ड देण्याजोगा !
अश्या या 'रामप्रसादच्या' मृतूनंतर काही वर्षे आम्ही त्याच्या आठवणींवरच काढली. श्री यमाईची पालखी, रथ काहीशा उदास आठवणीतच होत होते.
श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या लग्नात नागपूरच्या धनवाटेंनी कन्येला आहेर म्हणून 'मोती' हत्ती देणगी दिला आणि पुन्हा एकदा औंधात जान आली. हा 'मोती' आला तेव्हा छोटा व गोंडस बालहत्ती होता. राजस्थानातून याला आणले तेव्हा पुन्हा एकदा औंध गाव नव्हे पुरा सातारा जिल्हा स्वागताला वेशीवर जमा झाला. फुलांचे हार घालून ओवळून वाजत गाजत 'मोती' ची स्वारी गावात आली. खालच्या देवीच्या दर्शनाला त्याला थेट गाभाऱ्यात घंटेपर्यंत नेले. त्याने देवीचे दर्शन घेतले व देवीनेही त्याचे दर्शन घेतले. दोघेही धान्य झाले. पुन्हा एकदा औंधची शान झळकू लागली व उदास पालखी हंसली. आम्हा औंधकरांच्या ह्रदयावर राज्य करणारी गजलक्ष्मी स्वारी देवीसमोर झुलू लागली. 'टिपू सुलतान', 'रामप्रसाद' व 'मोती' अशा तीन हत्तींच्या पिढ्यांनी देवीची सेवा केली व 'मोती' आजही देवीची सेवा करतो आहे.
जो कोणी या गजलक्ष्मीवर जीवापाड प्रेम करेल त्याला यमाई काही कमी पडू देणार नाही. धनधान्य - समृद्धि मिळेल. हा वसा काही टाकू नये. हि साठा उत्तरांची कहाणी, पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण !

- श्री. उदय वसंत चितारी, सौ. सुनीति उदय चितारी

स्त्रोत : शिलंगण | खुले व्यासपीठ.....
श्री. उदय व चितारी, सौ. सुनीति उ चितारी
औंधचा हत्ती 'मोती'
औंधचा हत्ती 'मोती'
औंधचा हत्ती 'मोती'
औंधचा हत्ती 'मोती'

गेले ते दिन गेले - प्रा. शाम कुलकर्णी

 

प्रा. शाम कुलकर्णी यांनी औंधचे अतिशय सुरेख वर्णन आपल्या काव्यात केले आहे. जणू काही त्यांच्या बोटाला धरून आपण औंधची सैरच करतो आहोत. पूर्वस्मृतींना पुन्हा उजाळा मिळतो. औंधाची वेस, ते अगदी तळ्यापर्यंत आपण केव्हा आणि कसं पोहचतो ते कळतच नाही.

 

विषय मिळाला ऐसा सुंदर |
लिहिण्या त्यावर काव्यधुरंधर
कवी डुंबतो काव्यसमुंदर |
सज्जन म्हणती त्यास कलंदर
इतर बोलती महाबिलंदर |
प्रास्ताविक हे पुरे एवढे ||१||
गप्पा हाणता हाणता लागे दिसू वेस गावची |
येथूनच हो सुरु होतसे संस्कृती औंधाची ||२||
या झाडांच्या रंगामधुनी कितिकितिदा फिरलो |
चढलो यावरी बहू खेळलो पडता सावरलो ||३||
सूरपारंब्या इथे खेळलो झोकेहि तसे घेते झालो |
या वृक्षाच्या फांद्या मोडून धान्य आम्ही झालो ||४||
अन् रात्री त्या फांद्या पळवुन अंगणामधे लपवून ठेवुन |
शेकोटीचा जाळ पेटवून हर्षभरितही झालो ||५||
आला जिमखाना अहो हा आला जिमखाना |
शाळेमध्ये असता केल्या लीला इथे नाना ||६||
याच्यावरती दगड फेकुनी पत्रेही फोडले |
याच्या दारावरी आपटुनी बूट किती झिजवले ||७||
क्रिकेट आम्ही इथे खेळलो होतो फुटबॉल |
रिंग लगोऱ्या व्हॉलिबॉल पण तो तर गतकाळ ||८||
होते आमचे राजे मोठे रसिक नि श्रीमंत |
कृश व्यक्तीला पाहून त्यांना वाटतसे खन्त ||९||
सूर्यनमस्कारा घालुनिया दूध वरी प्यावे |
खूप खाऊनी खूप खेळून ते मग पचवावे ||१०||
मैदानावर याच सामने खेळांचे व्हावे |
त्यात मिळवूनी विजय लौकिका संपादित जावे ||११||
हीच मनीषा धरुनी चित्ती |
मेळावे खेळांचे भारती |
नृप आनंदा ये मग भारती |
शिमगास्पोर्ट्सहि त्याना म्हणती ||१२||
असो जाहलो हे गतकाळी |
खेळांस आता कुणी न वाली |
जे क्रीडांगण खेळा न पुरते |
आज मात्र एकाकी दिसते ||१३||
कलाभवन हे सुंदर आणि शांत स्थळी एकदा
यथासांग पूजाच कलेची होत असे सर्वदा ||१४||
तो कलामहर्षी नुरे आज येथला |
अन् कालाभवनला येत असे ही कला ||१५||
या इथे नि जोडा हात समाधीपुढती |
होतसे या स्थळी समाधिस्थ विभूती ती ||१६||
जरि दिसेल कचरा केरहि पडला येथे
जरि एकहि पणती मिणमिणती न येथे ||१७||
परि झाले होते अपूर्व उत्सव येथे
लक्ष्मी नि शारदा अपूर्व संगम येथे ||१८||
सूरराजालाही असे निमंत्रण येथे
साहित्यकलेचे अधिष्ठान ते होते ||१९||
सुश्राव्य कीर्तना इथेच श्रवले आम्ही
विद्वान रसिकजन इथे पहिले आम्ही ||२०||
काव्यास ऐकुनि मोर नाचले येथे
गायनास ऐकुनि रसिक डोलले येथे ||२१||
ते सूर गुंजतो इथल्या वातावरणी
वैषम्य आज नि:शब्दच हो ती वाणी ||२२||
मंगळवारी भरे गावचा आठवडी बाजार
काय असे पाहण्यास येथे जगही बाजार ||२३||
टाळुनि मधली स्थळे जाऊया अपुल्या शाळेकडे
दिसती आता मोडतोडक्या अवशेषांचे कडे ||२४||
या इथेच राम: रामौ आम्ही शिकलो
अन ए बी सी डी इथेच गिरवित बसलो ||२५||
या मंगळस्थानी सानेगुरुजी शिकले
गदिमाही बसले इथेच आणि शिकले ||२६||

रामायण रचुनी प्रतीवाल्मिकी झाले
त्याजागी आता नाव न कसले उरले ||२७||
देवालय देवीचे आले इथेच मंत्रोच्चारहि घुमले
गार गार या फारशीवरती
नमस्कारिता वपु थरारले ||२८||
औम रहाम रहीं रहीं घुमले जेथे
पाकोळ्यांची फडफड तेथे
विषण्ण मंदिर केविलवाणे
भरुनि मंद घंटानादाने ||२९||
हि आंबाबाई साक्ष उभी राहून
निर्विकार का मग सगळे हे पाहून
मिणमिणता रात्री दीप लागतो येथे
दर्शना याहुनी जास्त काय लागते ? ||३०||
उपयोग काय या झुंबर अन् हंड्यांचा
आसरा काय तो गरीब त्या चिमण्यांचा ?
हा उभा इथे जरि जीर्ण राजवाडा
कि प्राण जाऊनी उरला हा सांगाडा ||३१||
या इथेच झुलली सोन्याची अंबारी |
ती हत्तीवरती झूल असे जरतारी
सोनेरी काठी भालदार ललकारी
ती शिलंगणा निघताना राजेस्वारी ||३२||
तो ढोल नि ताशा सनई चौघडा नाद
अजुनीही कानी उठती ते पडसाद
तो राजा गेला वैभवही ते सरले
की तूप जळुनिया निरांजन ते उरले ||३३||
नगारखान्यामधेच चौघडा कधितरी धडधडतो
क्षीण ध्वनी जणु कोठीमध्ये उंदिर धडपडतो ||३४||
कंटाळुनि जर असाल गेला तर सोडुनिया गाव
घेऊन दर्शन केदारचे घ्या दत्ताचे नांव ||३५||
या दगडी पायऱ्या ज्या दिसती तुम्हाला
मूळपीठ देवीच्या नेती त्या चरणाला ||३६||
थांब रसिका पायथ्यास या थोडा वेळ बसू या
शतायुषी अण्णांच्या मंगल प्रतिमेला वंदू या ||३७||
जाऊनि घेऊ दर्शन वरच्या मूळपीठ देवीचे
तसेच घेऊ वरती चढुनी दर्शन प्राचीचे ||३८||
हा शीतल वारा येथुन वाहत आहे
गतवैभव स्मृती तो जणू सांगतो आहे ||३९||
चला करूया लगबग आणि उतरू या पायऱ्या
दिसती दुरुनी पर्वतवस्त्रा पडलेल्या जणु निऱ्या ||४०||
मध्यावरती भुवन रम्य हे सुंदर ते कसले
हे तर स्वप्नच जणु जगाच्या कलेस पडलेले ||४१||
म्युझियम हे पुरे एवढी साक्षच देण्याला
श्रमले इथले भूप कलेला प्रसन्न करण्याला ||४२||
सुंदर चित्रे सुंदर मूर्ती सुंदर बागेत
तशीच असतो कलादालने सुंदर वास्तूत ||४३||
सांगु किती मी कसे वर्णण्या शब्द नसे ज्याला
हे रसिकांनो जाऊन पहा प्रत्यक्षच मेळा ||४४||
शेजारी हे दिसते स्मारक असे त्याच राजाचे
कलासक्त अन् गुणसंग्राहक होउन जाई त्याचे ||४५||
कधि बोचरी थंडी येथे येउनी जाते
कधि उष्ण उन्हाची झळही चाटून जाते ||४६||
जो करण्या सेवा जनतेची बहु झटला
आश्रय दाता जो विव्द्त्ता नि कलेला ||४७||
गुणसंग्रह करणे व्यसन जयाचे होते
जनतेवर ज्याचे प्रेम मुलापरि होते ||४८||
तो राजा ज्याने इतिहासहि घडविला
स्मर भक्तीभावे त्याच्या पुण्यस्मृतीला ||४९||
आठवल्यावर येतिल रसिका पुसू नको आसवे |
तीच मौक्तिके ढाळुनी येथे पावन कर त्यांसवे ||५०||
करू त्या माळ मोत्यांची घालु या कंठि मूर्तिच्या
एवढी करतो सेवा रुजू या पायि औंधच्या ||५१||

 

- प्रा. शाम कुलकर्णी

स्त्रोत : शिलंगण | खुले व्यासपीठ.....
प्रा. शाम कुलकर्णी
औंधाची वेस
जिमखाना, औंध
श्रीनिवास महारांजाची समाधि, औंध
औंध येथील मंदिरे
श्रीमंत बाळासाहेब महारांजाची समाधि, औंध

स्मृतिसुमान हार - श्रीमती निर्मला दिवेकर

 

आठवणींची ओवुनी सुमने हार गुंफिला मनोमनी ।
पंचविस वरुषे का लोटला तरी न सुकल्या आठवणी ।
लग्न मंडपी पाऊल पडता शोभा देखिली या नयनी ।
अंबेचे ते मंदिर होते कलाकृतीची जणू खाणी ।।१।।
गावोगावी औंधकरांची कीर्ति राहिली दुमदुमुनी ।
वधू पित्यानी कन्या द्याव्या नगर सुशोभित पाहुनी ।
औंध नगरीची सासुरवासिण घेते बाई मी म्हणुनी ।
दुरूनि देखिले तेच रेखिले चित्र मनोहर या क्षणी।।२।।
राजदर्शना त्वरीतची गेले मामंजी मज घेवूनी ।
सुनबाईला सनदा अपुल्या दावा भटजी वाचोनी ।
असे सांगुनी आशिर्वाद मज दिधला प्रेमे हो त्यानी।
गरिब असो वा धनिक असला कलावंत येवो कोणी ।।३।।
जयास तैसी पुसती वार्ता मान तयाचा ठेवोनी।
असेच होते पंत प्रतिनिधी मागे न पुढे होती कुणी ।
उषःकाली मी सडा संमार्जन करीत असता येई ध्वनी ।
मोटारीतून स्वारी येई अंबा दर्शन घेवूनी ।।४।।
प्रतिदिनी करिती कलोपासना त्यातची झाले मुगुटमणी ।
स्वक्रियेने आदर्श बनले कीर्तिमान राजे म्हणुनी ।
फाल्गुनमासी पौर्णिमेसी आविचारा भर येई जनी
म्हणुनी राजे नाना छंदे जनमन रमविती हौसेनी।।५।।
खेळ नाटके धमाल चाले आनंद मावेना गगनी ।
कीर्तन सेवा स्वये करिती शिवरायाच्या जन्मदिनी ।
भाद्रपदी तो उत्सव चाले रंग भरे हो कीर्तनी ।
नानानगरीचे लोक येऊनी सेवा करिती व्याख्यानी ।।६।।
गुणी जनसंचय करण्यावाटे ' भवानरावा ' हौस मनी ।
ज्ञानाची ती रेलचेल जणू गंगा चाले वाहुनी ।
किती वर्णाव्या स्मृती तयांच्या अपुरी पडते लेखणी ।
म्हणुनी अर्पिते सान हार हा जन्म शताब्दीचे दिनी ।।७।।

- श्रीमती निर्मला दिवेकर

स्त्रोत : जन्मशताब्दी स्मरणिका | खुले व्यासपीठ.....
श्रीमती निर्मला दिवेकर
श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, औंध

माझे औंध - विश्वनाथ महादेव मेहेंदळे

 

डोंगरदऱ्यांच्या कवेत, हिरव्यागार शालीच्या उबेत,
मूळपीठ वासिनीच्या कृपेच्या छायेत !
इवलेसे टुमदार माझे गांव आहे वसून
नांव त्याचे औंध संस्थान, यावे एकदातरी पाहून !
रम्य ते बालपण आणि शालेय जीवन
आठवून सारे काही भरून येते मन !
किती उड्या मारल्या, किती खेळलो नि बागडलो
दंगा - मस्ती केली व मार खाल्ला पण तेवढ्यात जिद्दीने उभे राहिलो ।
दिवसभर खेळणे, यमाईच्या तळ्यात पोहणे
सर्वांची नजर चुकवून जत्रेत सिनेमे बघणे ।
वडिलांचे होते दुकान, नव्हती कशाचीच वाण
दहा जणांचे मेहेंदळे कुटुंब, एकत्र नांदत होते छान ।
पंत प्रतिनिधी राजघराणे आणि गावातील धन - दौलत
औंधविषयी तक्रार करण्याची नाही कोणामध्ये हिंमत ।
चांगले कलाकार घडवून दिले या इथल्या मातीने
गायन - वादन चित्रकला चौदा विद्या जिवंत येथे सरस्वतीच्या साक्षीने ।
हंड्या - झुंबरे, राजे - रजवाडे दीपमाळा वाढवितात वैभवाचा नूर
पूर्वी म्हणे निघत होता येथून सोन्याचा धूर ।
नवरात्र - शिलंगण सण - समारंभ उत्सव श्रावण - मासी
संक्रातीच्या पौष महिन्यात भोगी इथली खासी ।
भवानी वस्तू - संग्रहालयाने खोचला मनाचा तुरा
जपण्यासाठी पूर्व - इतिहास असतो सर्वांचा पहारा
बल आले पंखात तशी पाखरे गेली उडून
आपल्या बरोबरीचे सर्वजण गेले ही हुरहूर लागते राहून ।
कधीतरी आठवणींना मिळतो औंध संमेलनातून उजाळा
गावाचे या कसे फेडू उपकार, दाटून येतो उमाला ।

- विश्वनाथ महादेव मेहेंदळे

स्त्रोत : शिलंगण | खुले व्यासपीठ.....
विश्वनाथ महादेव मेहेंदळे
रम्य ते बालपण

"खारी-बटर-टोस्ट... ", हत्ती आला ते औंध.इन्फो चा logo. - श्री. आनंद मोहन साळुंखे

मागील महिन्यात whatsApp वर एक massage आला "आनंदजी कसे आहात, मुलांना सुट्टी आहे म्हणून औंधला घेऊन येतोय गेल्या वेळेस आलो होतो त्या वेळेस हत्ती पाहायला भेटला नाही, आता हत्ती कुठे पाहायला मिळेल मुलांना दाखवायचा आहे." नंबर अनोळखी होता पण मला समजले कि औंधला जायचं आहे आणि मदत हवी आहे म्हणून मी लगेच फोन लावला तर समोरून आवाज आला कि मी गेल्या वर्षी तुम्हाला फोन केला होता, आम्ही पुन्हा औंधला येतोय पण ह्या वेळेस मुलांना हत्ती पाहायचाय. प्राथमिक ओळख करून दिल्यानंतर मी माझ्या परेने त्यांना गाईड केले अन बोललो कि "peta" अंतर्गत हत्तीचे स्थलांतर करण्याची बातमी आहे कारण न्युज मध्ये ऐकलं होत पण तुम्हाला हत्ती पाहायला भेटेल. त्यावेळेस असं वाटलं नव्हते कि आजचा दिवस येईल असे. पण आज सकाळ पासून न्युज मध्ये असंख्य न्युज ह्या हत्ती स्थलांतराच्या पाहताना अंगावर काटाच उभा राहिला. हल्ली औंध बद्दल माहिती विचारण्यासाठी जर दुसऱ्यादिवशी फोन येतात अन माझी धडपड चालू होते. मग त्यामध्ये हत्ती बदलपण माहिती विचारतात दि. २८ फेब. २०१७ ला एक हत्तीच्या संधर्भात एक massage आला तो आसा "We have need Elephant for Wedding ceremony. if you take order about that please revert back with us. Please do the needful." - Shivaji Patil, Address: A/P Kandar, Tal- Karmala. massage पाहून मला हसायला आलं. मी काहीच उत्तर दिल नाही तर ह्यांचा मला फोन आला दोन दिवसाने मी त्यांना ग्रामपंचायतचा नंबर देऊन चौकशी करण्यास संगीतातले. असे अनेक massages आले असतील मागील काही वर्षात पण ह्या शुक्रवारी दि ९-६-२०१७ ला Saurabh Wadekar ह्या मुलाचा "please dont send Gajraj elephant anywhere" असा massage आला अन मग विचारात पडलो कि मी काय करू शकतो... खरं तर आता काहीच नाही... आणि आधी पण काहीच केलं नाही...
पण औंधच्या ह्या "मोती" हत्तीच्या आठवणींना उजाळातर नक्कीच देऊ शकतो तेव्हा आज पासून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी त्या आठवणींतून मोतीला आपल्या स्मुतीत ठेवण्याचे काम नक्कीच करिन सुरवात आज पासूनच...
मला माझं गाव हे नेहमीच इतर गावांपेक्षा वेगळं वाटत, अगदी मला कळायला लागल्यापासून पण हे वेगळपण काय आहे हे शोधण्याचे काम मागील दहा वर्षांपासून मी सुरु केलं ते औंध.इन्फो या संकेतस्थळाच्या माध्यमातून पण सुरवातीला काहीच माहिती नव्हती तेव्हा या संकेतस्थळाचा logo बनवताना हे वेगळपण मला दाखवायचे होते आता ते कसे दाखवणार त्या करीता बरीच मेहनत घेतली अन logo मध्ये औंधचा हत्ती "मोती" समाविष्ठ झाला. आजवर खुपश्या लोकांना भेटण्याचा योग्य आला अन ह्या logo चे कौतुन झाले त्या बरोबर प्रश्न देखील येत असे "हत्तीचं का?" मग माझे तयार असलेले उत्तर जे सर्वाना पटायचे ते असे कि "औंध हे संथान आहे. (होते) अन ते कला क्रीडा साहित्य सर्वांगांनी समुद्ध होते. हत्ती हे ऐश्वर्य समृद्धीचे साम्राज्याचे प्रतीक असते म्हणून तो औध संस्थानाचे प्रतिनिधित्व करतो". हे सर्वसामान्याला समजेल असे माझे ठरलेले उत्तर, पण खरी कहाणी अशी...
आमचा गावात छोटासा वाडा आहे मी तिथेच लहानाचा मोठा झालो. मला आठवते कि मी खूप लहान होतो तेव्हा अगदी सकाळी एक बटर, खरीवाला सायकल वरून "खारी-बटर-टोस्ट... ". अशी आरोळी देत यायचा मला रोज वाटायचं कि त्याच्या कडून बटर घ्यावे खाण्यासाठी नव्हे तर त्याच्या मागून आमचा मित्र "मोती" मोठ्याने घंटा नाद करत यायचा आथिर्क परिस्थितीमुळे बटर कधी घेतल्याचे आठवत नाही पण घंटा वाजली कि हत्ती आला, हत्ती आला अश्या आरोळ्या देत मोतीच्या स्वागताला हजार असायचो गरम ताजी चपाती घेऊन. कुंभार वाड्यातून त्याचा येण्याचा मार्ग होता आमचच्या दारापुढून गेला कि त्याच्या मागे मागे पिंपळाजवळ जात तिथे त्याला रामभाऊ देखमुख नेमाने नारळ देतं तो नारळ हत्ती सोंडेने पायाखाली ठेऊन त्याचे दोन तुकडे करी एक माहुतास सोंड वर करून देई तर दुसरा रामभाऊंना.
हत्तीला लोक नारळ, चपाती, भाकरी किंवा पैसे देत असे व ते सर्व तो सोंडवर करून माहुतास देऊन परत उलटी सोंड पुढे करी त्याला हात लावून पाय पडायचे असते नंतर तो तीच सोंड डोक्यावरती ठेवायचा हे पाहायला माझ्या वाटायची पण तो आशीर्वाद घेण्याचे धाडस यायला खूप वर्षे गेली. तिथून पुढे तो ज्या मार्गाने ग्राम प्रदक्षणा घालायचा त्या मार्गाने आम्ही कित्येक मुले त्याच्या मागे फिरत असू. इतर पूर्ण वेळ हा हत्ती पागेत त्याच एक भलं मोठ्ठ घर होते तिथे असे. अन त्याचा बाजूला आमची प्राथमिक शाळा मग मधल्या सुट्टीत पण आम्ही हत्ती पाहायला जायचो तो फक्त झुलत असायचा अन वाळके गावात अंगावर फेकायचा तेव्हडाच त्याचा कार्यक्रम पण तेच आम्ही पाहत असू तासंतास का कोणास ठेऊक, ते त्याच भव्य रूप माझ्या माझ्यात अगदी बाळपण पासून ठासून ठासून भरलाय. मोती ची विविध रूप मी पहिली आहेत पागेत बांधलेला असताना, तेथील आडावरती अंगोळ करताना, रोडवरून फिरताना, सकाळची गावातील फेरी, मूळपीठच्या पायथ्याला गवताचे ओझे घेऊन येताना, तळ्यावरती, यमाईच्या मंदिरात रात्री आरतीला असणारा मोती तर सणासुदीला, यात्रेला रथापुढे, छबिन्यान मोतीचा रुबाब वेगळा राजेशाही थाट-माट देखणा, रुबाबदार मोतीची प्रतिमा माझ्या डोळ्यात आहे.
हेच ते चालतं-फिरतं वेगळंपण जे माझ्या मनात माझ्या लहानपण पासून आहे तेच logo आलं.
हा अर्थ कधी कोणाला सांगावासा वाटलं नाही कारण विनाकारण येवढ कोणी ऐकेल असं वाटायचं परंतु आजच्या घटनेने मन मोकळं झालं. अन मोती हत्ती माझ्या मनाच्या कोणत्या कप्यात आहे ते मला पण उमगलं.
औंध.इन्फो च्या लोगो रूपानं तो सदैव माझ्या सोबत होता, आहे आणि असणार यात तीळमात्र शंका नाही.

- श्री. आनंद मोहन साळुंखे
निर्माता - औंध.इन्फो

स्त्रोत : औंध रथोत्सव २८ जानेवारी २०१३.| खुले व्यासपीठ.....
"मोती"
गुगल जाहिरात

डि. जे. च्या तालावर बेधुंद औंधचा रथोत्सव ... - श्री. आनंद मोहन साळुंखे (निर्माता - औंध.इन्फो)

औंध बदलतंय अगदी वाऱ्याच्या वेगाने. बदल अपेक्षितच आहेत कारण काळ बदलतोय आणि त्या प्रवाहाच्या दिशेने सर्वजन वाहत चालले आहेत म्हणजे जे चाललंय ते औंधच्या जनतेला पटतंय म्हणूनचना?
औंधची यात्रा अबाल वृद्धांना हवीहवीशी वाटणारी कारण कितेक पिढ्यानपिढ्या ती अविरतपणे सामाजिक, सासंकृतिक, शैक्षणिक वारसा जपत चालू आहे पण हाच हेतू कालच्या रथोत्सवात दिसला का?
काही निरुत्तरीय प्रश्नच मनामध्ये आहेत तुम्हाच्या मनामध्ये काय आहे?
यात्रेचे नियोजन हा अत्यंत महत्वाचा भाग कुमकुवत दिसतो काय कि व्यापारी करणाकडे झुकलेला दिसतो?
नियोजक दरवर्षी चुकीची कार्यक्रम पत्रिका का छापतात, विशेष आणि प्रमुख उपस्थिती मध्ये असंख्य दिग्गज मंत्रांची नावे असतात पण या पैकी कोणीही नसते का?
औंध गावाच्या ग्रामस्थांची दीपोत्सवास व रथोत्सवाच्या प्ररंभी उपस्थिती का नसते?
गरजे पेक्षा जास्त डि. जे. कश्यासाठी असतात आणि त्यांच्यावर नियतरण का नसते?
डि. जे. पुढे नाचणाऱ्यान मुळे स्त्रीवर्गास, बालकांस व वृद्ध भाविकांस त्रास होतो का?
लोककला सादर करणाऱ्या कलाकारांना प्राधान्य मिळते का की त्यांची संख्या घटतेय?
नियोजकांना सामाजिक उपक्रम राबिवण्यात, गावातील गरजा निवारण करण्यात रस दिसतो काय?
यात्रेतील विविध कायर्क्रमाचे बजेट अवाजवी अवाढव्य वाटते काय?
वर्तमान पत्रातून, पुरवण्यातून प्रसिद्ध होणारे लेख माहित्या चुकीच्या का असतात?
या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांनी मनात काहूल माजलंय तुम्हची काय स्थिती आहे?
नियोजाकांकडून काही चागले उपक्रम, कार्यक्रम राबवले जात आहेत त्यांचे कौतुकच आहे पण माझ्या प्रश्नांची उत्तरे हि नियोजाकांची जबाबदारी आहे असे वाटते .

- श्री. आनंद मोहन साळुंखे
निर्माता - औंध.इन्फो

स्त्रोत : औंध रथोत्सव २८ जानेवारी २०१३.| खुले व्यासपीठ.....
डि. जे.
गुगल जाहिरात

दै. तरून भारत (सातारा)

प्रति,

संपादक, दै. तरून भारत (सातारा)

 

विषय : आपणाकडून दि. २० जानेवारी २०११ रोजी ' श्री यमाईदेवी (औंध) शतक महोत्सवी यात्रा विशेष ' हि पुरवणी प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये काही चुकीची माहिती आढळून आली त्या बाबत .

 

मा. महोदय,
मी आनंद मोहन साळुंखे, निर्माता : औंध.इन्फो,
प्रथमत: मी आपले आभर मानतो कि आपण उपरोक्त पुरवणी प्रकाशित केली. त्या करिता आमच्या औंध. इन्फो परिवार तर्फे धन्यवाद !
पूर्ण पुरवणी वाचली, फिरोज मुलाणी, औंध , अरविंद वायदंडे, भोसरे , सरफराज बागवान, पुसेसावळी आणि छायाचित्रकर- मुन्ना मोदी या सर्वांचे देखील या उपक्रम बद्दल धन्यवाद !
पुरवणी सुरेख, सुंदर अशीच आहे, परंतु काही थोड्या त्रुटी आढळल्या त्या खाली नमूद करीत आहे.
कृपया औंध सारख्या इतिहासाच्या सुवर्ण पानांबद्दल लिहिताना अचूकतेचे काटेकोर पालन व्हायला हवे, पुरवणी संकलक औंधचे आहेत ???
असो ,
खालील त्रुटी ह्या प्रिंनटिंगच्या असू शकत नाहीत.

 

१ - मुलाणी यांच्या पहिल्या पानावरील पहिल्या लेखात (अलौकिक शक्तीपीठ) १३ ओळीची सुरुवात ' नाष्णी नदी ' असा करतात, पण ' नाष्णी ' हा उल्लेख चुकीचा असून ' नंदनी ' असा असायला हवा कारण नाहनी चा अपभ्रंश होऊन ' नांदणी नदी ' असा झाला आहे.
२ - याच लेखात यमाई मंदिरा पुढील दीपमाळीची उंची ६० फुट तर पान ८ वरील त्यांच्याच, ' डोळे दिपवणारी दीपमाळ... ' या लेखात दीपमाळीची उंची ८० फुट ' असे लिहतात, वात्सविक दीपमाळीची उंची ६५ फुट एवढी आहे, असे भवानराव गौरव ग्रंथात नमूद आहे.
३ - मुलाणी 'डोळे दिपवणारी दीपमाळ... ' याच लेखात बाळासाहेब महाराजांचे नावं ' भगवानराव ' असे लिहतात, संपूर्ण पुरवणीत बाळासाहेब महाराजांचे चुकीचे नावं वापरण्यात आले आहे कधी ' भगवंतराव ' तर कधी 'भगवानराव' या पैकी काहीही नसून बाळासाहेब महाराजांचे नावं ' भवानराव ' असे आहे.
४ - ' दीपमाळेचा निर्मिती काळ १२२ वर्षापूर्वीचा, आणि दीपमाळेचे बांधकाम १८८२ साली कै. श्रीनिवास परशुराम पंडित पंतप्रतिनिधि यांनी केले. ' असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख चुकीचा वाटतो कारण, बाँबे गॅझेटियरमध्यें 'अफ्झुलखानासारख्या विध्वंसकालाहि ती नाश करू नये, असें वाटल्याचा उल्लेख आहे.' तसेच शके १८४६ साली प्रसिध्द झालेल्या ' सातारच्या प्रतिनिधि घराण्याचा इतिहास ' या ग्रंथाच्या तपशिलावरून दीपमाळ हि १५००० वर्षापूर्वीची असावी असे वाटते .
५ - अरविंद वायदंडे, भोसरे हे पान ७ वरील आपल्या 'ऐतिहासिक, शैक्षणिक आन् कलेचा वारसा ' या लेकात बाळासाहेबांचे नावं ' भगवंतराव ' असे चुकीचे लिहितात .
६ - अरविंद वायदंडे, भोसरे हे ' भारतात पहिली लोकशाही औंधनगरीत नांदली ' या पान ७ वरील लेखात ' भगवंतराव ' आणि पान ६ वरील लेखात ' भगवानराव ' अशी चुकीची नांवे लिहतात, एका व्यक्तीला किती नावे असू शकतात, अहो बाळासाहेबांचे योग्य नांव " भवानराव भवानराव भवानराव भवानराव........" हेच आहे, लेख बद्दललाकी नावं कसे बद्द्लेल.
७ - याच लेखात बाळासाहेब महाराजांचा जन्म २४ नोव्हेंबर १८६८ असा लिहला आहे, योग्य दिनांक " २४ ऑक्टोबर १८६८ " अशी आहे.

 

बापरे पुरवणी आहे कि चुकांची ( खिळ्यांची ) गुळवणी, कशी प्यायची अन् कशी पचवायची ?
तेव्हा पुरवणी मागील हेतू मुळीच चुकीचा नाही पण चुकातर आहेतच.
भावनात्मक आघांता बद्दल क्षमस्व !
कळावे.

- श्री. आनंद मोहन साळुंखे ( औंधकर )

स्त्रोत : दै. तरून भारत (सातारा) दि. २० जानेवारी २०१० | खुले व्यासपीठ.....
दै. तरून भारत दि. २० जानेवारी २०१०
दै. तरून भारत दि. २० जानेवारी २०१०